नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायदयाच्या विरोधात जवळपास अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता गाजीपूर सीमेवर भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिला आहे.
राकेश टिकैत यांनी, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळं या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील, असे म्हटले आहे. तसेच शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र सरकारला चर्चा करायचीच नाही. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असे टिकैत यांनी म्हटले आहे.
तसेच टिकैत यांनी, यामुळे गावांमधील लोकं आंदोलनात जास्तीत जास्त येतील. प्रत्येक गावातून 15 शेतकरी आणि 10 दिवसांसाठी येतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या 15 लोकांचा समूह येईल. त्यानंतर आधीपासून आंदोलनात असलेले शेतकरी आपल्या गावी जाऊन शेती करु शकतील, अस टिकैत म्हणाले.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ करण्याची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.