चेन्नई : भारत आणि चीन दरम्यान सहकार्याचे नवे पर्व करण्याचा निश्चय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान शी जीनपींग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठकीची सांगता झाली. विवेकाने मतभेद संपवायचे आणि त्याचे वादात रुपांतर करूच द्यायचे नाही, असे दोन्ही नेत्यांनी ठरविले.
एकमेकांच्या चिंतांबाबत संवेदनशील राहण्याचाही आम्ही निर्धार केला आहे. मतभेद संयमाने मिटवायचे आणि त्याचे वादात रुपांतरच होऊ द्यायचे नाही हेही आम्ही ठरवले असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, चीनमधील वुहान येथे झालेल्या शिखर परिषदेपासून दोन्ही राष्ट्रांतील संबंधात अधिक स्थैर्य आले आहे. दोन्ही बाजूने धोरणात्मक संवादात वाढ झाली आहे.
शी म्हणाले, द्विपक्षीय संबंधाबाबत आमचा मनापासून संवाद झाला. या शिखर परिषदेतून भारत चीन संबंधात भरघोस प्रगती झाली आहे. अशा पध्दतीच्या अनौपचारिक चर्चेतून जे निष्पन्न झाले, त्यातून आमचा निर्णय योग्य होता, हेच सिध्द होते. अशास्वरूपाचा संवाद यापुढेही सुरू राहील.