नवी दिल्ली : भारत विरोधी भूमिकेसाठी मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली एका नव्या वादात सापडले आहेत. के.पी.शर्मा ओली यांनी अलीकडेच रिसर्च अँड अॅनलिसिस विंगचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीची माहिती समोर आल्यानंतर, ओली यांच्यावर तीन माजी पंतप्रधान आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी बोचरी टीका केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ ही भारताची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे. पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना भेटणे, हे अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे, अशा शब्दात पुष्पा कमाल दहल प्रचंड, झालानाथ खानाल आणि माधव कुमार नेपाळ या माजी पंतप्रधानांनी टीका केली आहे. माजी उप पंतप्रधान भीम बहादूर रावल आणि नारायण काजी श्रेष्ठा यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या तसेच काहींनी सोशल मीडियावरुन ओलींवर टीका केली.
‘रॉ’ प्रमुखांसोबत दोन तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या बैठकीत काय चर्चा झाली? त्याची माहिती देण्यास या नेत्यांनी सांगितले आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत ही बैठक सुरु होती. सामंत कुमार गोयल आणि टीम विशेष विमानाने काठमांडूला गेली. २४ तासाच्या या दौऱ्यात रॉ प्रमुख आणि टीमने विरोधी पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा, माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांची सुद्धा भेट घेतली.
भारताचे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे पुढच्या महिन्यात नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी रॉ प्रमुखांनी नेपाळला भेट दिली. उत्तराखंडमधील भारतीय भागांचा नेपाळने आपल्या नकाशात समावेश केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते. आता हळूहळू भारत-नेपाळ संबंध पूर्ववत होत आहे. नेपाळने मागच्या काही महिन्यात चीनला अनुकूल भूमिका घेतली आणि विनाकारण भारताबरोबरचे संबंध खराब केले.