विधानसभेसाठी इंदापुरातून मातब्बर इच्छुक
माजी सहकारमंत्री व कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूर तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे हर्षवर्धन पाटील यांचे मोठे आव्हान असणार आहे.
राज्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील हे गेली 15 वर्षे मंत्री म्हणून सक्रिय होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला. आमदार भरणे यांनी त्यानंतर गेल्या पाच वर्षांत मोठी ताकद निर्माण केली आहे. विधानसभेसाठी जिल्हा आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे नेते अशोक घोगरे, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनीही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे.
इंदापूर तालुक्यातील राजकीय वजनदार असलेले व्यक्तिमत्त्व आप्पासाहेब जगदाळे यांनी नुकताच पक्षाच्या माध्यमातून मेळावा घेतला होता. यातून जगदाळे यांनी आपली ताकद आजमविण्याचा एक केला. माने यांनीही इंदापूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या चांगल्या प्रकारे पाय रोवले आहेत. तरुण कार्यकर्त्यांत त्यांची मोठी “क्रेझ’ आहे. तालुक्यात कार्यकर्ते जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. अशोक घोगरे, भाऊसाहेब सपकळ यांनीही विधानसभेसाठी जय्यत तयारी केली आहे.
सर्व घडामोडींमुळे आमदार भरणे यांच्यापुढे उमेदवारीसाठीही चुरस असणार आहे. इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा असेल तर तालुक्यातील इच्छुकांसह इतर सर्वच नेते मंडळी यांच्या पाठबळाची गरज आमदार भरणे यांना लागणार आहे; परंतु इंदापुरच्या उमेदवारीचा प्रश्न कसा सोडवायचा, याचे मोठे कोडे पक्षश्रेष्ठींपुढे असणार आहे.
इंदापूरच्या राजकारणात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे सुतेपाते किती आहे हे जगजाहीर आहे. आतापर्यंत पाटील यांना नेहमीच विधानसभेसाठी झगडावे लागले आहे. यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता युतीचे कार्यकर्ते पाटील यांच्यामागे असतील. त्यांचीही ताकद आता वाढली आहे. पाटील यांना लढत द्यायची असेल, तर राष्ट्रवादीच्या इच्छुक आणि नेत्यांची सांगड घालावी लागणार आहे. त्यामुळे आगामी सामना राष्ट्रवादी व भाजप असाच होणार असल्याचे स्पष्ट आहे.
पाण्याच्या मुद्द्यावर मतदान…
इंदापूर तालुक्याच्या सर्वच भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तालुक्याला पाण्याचा प्रश्न कायम भेडसावत आहे. तालुक्यातील तलावांत पाणी पोहोचत नाही. याबाबत कायम ओरड होत असते. यामध्येही आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कायम चढाओढ निर्माण असते. विधानसभेची निवडणूक पाहता आमदार कोणीही होवो, तालुक्यातील तलाव हा भरला गेला पाहिजे व जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे, हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत याच प्रश्नावर राजकारण आणि मतदार फिरणार आहेत.