मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर प्रकाशझोतात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मयुरेश राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांवर अपसंपदेची गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने मयुरेश यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना 24 मे रोजी ठाण्यातील एसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.