नवी दिल्ली – करोनाच्या साथीच्या काळामध्ये इतर समस्यांबरोबरच देशांमध्ये आत्मनिर्भरतेची क्षमता विकसित झाली आहे. “मेड इन इंडिया’चा आग्रह धरत असताना तसेच “व्होकल फोर लोकल’ मंत्र जोपासत असताना आपल्या उत्पादकांनी जागतिक दर्जाच्या वस्तू बनवून “झिरो इफेक्ट आणि डिफेक्ट’ हे ध्येय ठेवावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करताना म्हणाले.
आपल्याला मिळत असलेल्या बऱ्याच पत्रांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी अंजली यांनी कोल्हापूरहून पाठवलेल्या देशाला शुभेच्छा देण्याच्या संकल्पाच्या सूचनेचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि आणि मुंबईच्या अभिषेक यांनी या कठीण काळात आपल्याला जी एक नवीन शिकवण मिळाली आहे ती देखील आपल्याला कळवल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यावेळी पंतप्रधानांनी श्री तेग बहादुर जी, श्री गुरू गोविंद सिंगजी यांच्या बलिदानाला नमन केले.
देशामध्ये आणि खास करून मध्यभारतात बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करून ही एक मोठी कामगिरी असल्याचा उल्लेख केला. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश आणि कर्नाटक बरोबर महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. सध्या कडाक्याच्या थंडीत आणि इतर वेळी देखील प्राणिमात्रांच्या प्रति भूतदया दाखवणाऱ्या लोकांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
तसेच यावेळी कोविडच्या साथीत देखील अध्यापनाचे कार्य सुरू ठेवणाऱ्या हेमलता एन. के. या शिक्षिकेचा पंतप्रधानांनी गौरव केला. कश्मीरी केशरला भौगोलिक संकेत टॅग मिळाला असून लवकरच कश्मीरी केशर एक जागतिक लोकप्रिय ब्रॅंड बनेल असे पंतप्रधान म्हणाले. शेवटी पंतप्रधानांनी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पासून देशाला मुक्त करण्याचे आवाहन करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.