नवी दिल्ली : भाजपाचे सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात असे. आता सर्वांना समान न्याय मिळतो. २०१७ पूर्वी फक्त जे ‘अब्बा जान’ म्हणत होते, तेच रेशन संपवत होते असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. हा वाद निवळत असतानाच आता पुन्हा भाजपाने ‘अब्बा जान’चे एक व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
उत्तर प्रदेश भाजपने हे व्यंगचित्र शेअर करून एएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. व्यंगचित्रात ओवैसी आणि अखिलेश यादव यांना मुघल सम्राट जहांगीर आणि अनारकली दाखवले गेले आहे. जे गरीबांच्या रेशनचा गैरवापर करत आहेत. तर ‘अब्बा जान’ म्हणून मुलायमसिंह यादव यांना दाखवले असून ते रेशनचा गैरवापर होताना बघत बसले होते, असे चित्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या ‘अब्बा जान’ टीप्पणीनंतर अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर टीका केली होती. “चार वर्षांहून अधिक काळानंतरही, हे सरकार केवळ नावं आणि रंग बदलण्यात व्यक्त आहे. सपा सरकारने केलेली कामं स्वतःची असल्याचा दावा करत आहे. त्यांना माहित आहे की त्यांचे सरकार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे,” असे अखिलेश यादव म्हणाले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला होता की, “समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. ते केवळ अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते.
२०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल”.