नेवासा – अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने पाणी घेवून जाण्यासाठी आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील पाच जण गोदावरी नदीमध्ये बुडाल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवार (दि.११) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
गोदावरी नदीपात्रात पाच जण बुडालेले असतांना एक जण सुदैवाने नदीपात्रातून स्थानिक नागरीकांच्या व प्रशासनाच्या मदतीने पोहून बाहेर आलेला आहे. तर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेले असून अन्य दोघा जणांचा युद्ध पातळीवर स्थानिक नागरीकांच्या व प्रशासनाच्या मदतीने शोध सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरु आहे.