डॉ. एन. राम : “राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन’
पुणे – वाढत जाणाऱ्या यलो जर्नालिझम काळात पत्रकारांना स्वयंनियमांचे महत्त्व आहे. या क्षेत्रात वावरताना पत्रकाराने स्वत:चे आरोग्य सांभाळून न्युट्रल पत्रकारिता करावी, असे विचार ज्येष्ठ पत्रकार डॉ. एन. राम यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित “राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी “जेएनयू’ विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे डॉ. पुष्पेष पंथ, राजकीय विश्लेषक आलोक मेहता, संजय बारू आणि श्रवण गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड आणि कुलगुरू प्रा. डॉ. एन. टी. राव, प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व डॉ. अनुराधा पराशर उपस्थित होते.
डॉ. एन. राम म्हणाले, यलो जर्नालिझममध्ये होणारी वाढ ही भारतीय नागरिकांसाठी सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे संस्थेचे नुकसान होते. विश्वसार्हता, माहिती आणि गंभीर मूल्यांकन तपासणीशी संबंधित काम चांगल्या प्रकारे केले गेले पाहिजे. तसेच, करोनामुळे भारताबरोबरच अन्य देशातील माध्यमांची स्थिती ही गंभीर झाली आहे. सध्याच्या काळात माध्यमांवर नागरिक किती विश्वास ठेवतात हे सांगता येत नाही. भारत देश हा विविध जाती धर्मांनी नटलेला असताना आपण समाजात कशाप्रकारे शांती निर्माण करू यावर माध्यमांनी कार्य करावे.
श्रवण गर्ग म्हणाले, नैतिकतेशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही. विश्वशांती ही एक जागतिक संकल्पना असल्याने त्यासाठी नैतिक पत्रकारिता हीच गरजेची आहे. या क्षेत्रात दोन्हीं बाजू समजून घेऊन मत मांडावे.
आलोक मेहता म्हणाले, माध्यमांनी समाजात प्रपोगंडा पसरवू नये. वर्तमान काळात प्रादेशिक टीव्ही, वृत्तपत्र, युट्यूब यांचा समाजावर अधिक प्रभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे वाढत जाणारा सोशल मीडिया आणि मोबाइलचाही प्रभाव दिसतो. माध्यम हे कोणत्याही शहरापुरती किंवा भाषेपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रात नैतिकता महत्त्वाची आहे.