देहूरोड परिसरातील मोबाइल ग्राहकांची समस्या वाढली
देहूगाव – देहू-देहूरोड परिसरात मोबाइलचे नेटवर्क वारंवार गायब होत असून, कॉल ड्रॉप होत असल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त झाले आहेत.
देहू, देहूरोड परिसरामध्ये सर्वच मोबाइल ग्राहकांकडे विविध कंपन्यांचे सीम कार्ड आहेत. परिसरामध्ये विविध कंपनीच्या अनेक मोबाइल टॉवरही आहेत. मोबाईल ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ग्राहकाकडे दोन-तीन कंपनीचे सीमकार्ड क्रमांक आहेत. मात्र वारंवार नेटवर्क गायब होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, रिंग न वाजणे, फोन लागला तर आवाज ऐकू न येणे, अनेकदा बोलता-बोलता फोन कट होणे, अशा अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाइल सेवा देणाऱ्या जवळपास सर्वच कंपन्यांकडून ग्राहक त्रस्त झाले आहेत.
कॉल करण्यासाठी प्रति महिना रिचार्ज करावे लागते. रिचार्ज सेवा महिन्या ऐवजी वेळेपासून फक्त 28 दिवसांकरता मिळते. ते ही रात्री बारा वाजता न चुकता बंद होते. अनेक मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीचे मात्र विविध सेवा किंवा ऑफरसाठी दिवसातून अनेक वेळा फोन येतात. एखादी घटना, अति महत्वाच्या कामकाजात असताना वाहन चालविताना अशा येणाऱ्या अनेक ग्राहक डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे “कस्टमर नंबर’, तर अनेक वेळा लागतच नाही. लागलाच तर ऑफरची रीघ लागलेली असते. विविध कंपन्या फक्त चांगली सेवा देण्याचे आश्वासन देतात सेवा मात्र मिळत नाही.
अनेक वेळा नेटवर्क बंद असलेले दिवस किंवा वेळ वाढवून मिळत नाही, तर त्याचा मोबदलाही ग्राहकांना मिळत नाही. या कंपन्या फक्त ग्राहकांची लूट करत असल्याचा आरोप ग्राहक करू लागले आहेत. त्रस्त आणि संतप्त झालेले अनेक ग्राहक न्यायालयाकडे तर ग्राहक मंचाकडे दाद मागणार आहेत.
“डिजिटल इंडिया’त नेटवर्क गूल
डिजिटल इंडिया बनण्यासाठी एटीएम, क्रेडिट कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे, अमेझॉन अशा विविध कंपन्यांचे व्यवहारातील रकमाच्या देवाण घेवाण करण्यासाठी वापर केला जातो. मात्र नेटवर्क गुलने अनेक वेळा ग्राहकांना त्रासही होत आहे.