एफएमओ बॅंकेकडून 120 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा : शेतकऱ्यांना होणार लाभ
पुणे – दिवसेंदिवस कृषी क्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपन्यांची पत वाढू लागली असून आता भविष्यात शेतकऱ्यांना अशा कंपन्यांचा मोठा आधार असणार आहे. राज्यातील ही बाब ओळखून देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला एफएमओ बॅंकेकडून (नेदरलॅंड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सुमारे 120 कोटींचा (15 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्तपुरवठा करणार आहे. अशाप्रकारचा वित्तपुरवठा करण्यामागे व्यापक सामाजिक हित पाहिले जाते. त्याला सोशल इम्पॅक्ट फंड म्हटले जाते. त्याचा शेती उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने हा वित्तपुरवठा करण्यात आला आहे.
एक मजबूत व शाश्वत मूल्यसाखळी (व्हॅल्यू चेन) निर्माण करण्यासाठी भारतीय शेतीत अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. या गुंतवणुकीमुळे कृषी आणि कृषि प्रक्रिया कार्याला चालना मिळून शेतमालाची नासाडी थांबू शकणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे बॅंकांसाठी धोक्याचे (रिस्क) वाटते. विखुरलेले शेतकरी दिशाहीन असतात. प्रत्येक बाबतीत ते कशावर अवलंबून असतात. काही विपरित घडले तर त्यांची शेती कोलमडून पडते. सह्याद्रीने छोट्या शेतकऱ्यांना एकत्र करून एक आदर्श मॉडेल ठेवले आहे. भविष्याचे भान, आकांक्षा आणि क्षमता यांचा तुम्ही पुरेपूर वापर केला आहे. सह्याद्रीसारख्या मॉडेलशी संलग्न राहिल्यास व्यवसायाबरोबरचे बॅंका किंवा वित्तीय संस्थांचे कर्जपुरवठा करण्यातील धोकेही कमी होणार आहेत.
जगातील सर्वांत आव्हानात्मक व्यवसायासांठी ही बॅंक प्रामुख्याने कर्जपुरवठा करते. आशिया खंडात विशेषतः भारतात शेती हा व्यवसाय त्या प्रकारात गणला जातो. एफएमओने सह्याद्रीला केलेला हा आर्थिक पुरवठा सह्याद्री कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
कृषीमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये कृषिमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.