तेवीस जानेवारी 1897 हा, मातृभूमीचे असीम उपासक सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध निग्रहानं आणि निकरानं घेतलेली एक अविरत झुंज होती. सुभाषबाबूंचे रोमहर्षक व थरारक जीवन पाहिले तर आपण विस्मयचकित होतो. सुभाषबाबूंना असामान्य प्रज्ञा लाभली होती. मॅट्रिकच्या परीक्षेत ते कलकत्ता विद्यापीठात दुसरे तर आयसीएसमध्ये चौथे आले होते. आयसीएस होणे म्हणजे त्या काळात ऐश्वर्यसंपन्न, प्रतिष्ठित जीवनाची गुरुकिल्लीच! पण या मनस्वी युवकाने ही लाखमोलाची सनद झिडकारली व भारताच्या स्वातंत्र्यासाठी तन-मन-धन अर्पण केले.
ब्रिटिशांनी अनेकदा त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा छळ केला. इतका की तुरुंगातच त्यांची मरणप्राय अवस्था झाली. माफी मागण्याचे मात्र त्यांनी नाकारले. त्यांची तब्येत इतकी खालावली की, घाबरून उपचारासाठी त्यांना परदेशी जाण्यास परवानगी दिली गेली. हिंदुस्थानात मात्र कोठेही फिरण्यास बंदी केली. वृद्ध आईवडिलांनाही भेटण्याची परवानगी नाकारली.
परदेशात जाण्याची मिळालेली संधी सुभाषबाबूंनी वाया घालवली नाही. त्यांनी लंडन, जर्मनी, प्राग, झेकोस्लोव्हाकिया, वॉर्सा, बर्लिन, इटली, रोम या देशांना भेटी देऊन भारताच्या स्वातंत्र्यास त्यांचा पाठिंबा मिळवला. या सर्व देशांमध्ये प्रचंड संख्येने लोकांनी त्यांचे स्वागत केले. इतक्या दगदगीमध्येही त्यांनी साडेतीनशे पानांचा “द इंडियन स्ट्रगल’ नावाचा ग्रंथ लिहिला. परदेशातून परतल्यावर भारतात त्यांची अवस्था अशी झाली की, तुरुंगाबाहेर राहिले तर नजरकैदेत व सभा घेतली, भाषण दिले तर ताबडतोब तुरुंगात रवानगी. त्यांचे मन मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास तळमळू लागले. अखेरीस दुसऱ्या महायुद्धात “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ असा विचार करून सुभाषबाबूंनी इंग्लंडच्या विरोधातील देशांमध्ये जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत मिळवण्याचा निश्चय केला.
नजरकैदेत असतानाच 27 जानेवारी 1941 या दिवशी सुभाषबाबूंनी पलायन केले. जीवावरची जोखीम घेऊन ते आधी पेशावरला गेले. मग अफगाणिस्तान व तेथून काबूल गाठले. खूप खबरदारी घेऊन, नाना खटपटी करून, ते जर्मनीत गेले. हिटलरने त्यांना संपूर्ण सहकार्य दिले. वेगवेगळ्या देशातील हजारो युद्धबंदी सैनिक आझाद हिंद सेनेमध्ये सामील होऊ लागले व त्यानंतर सुभाषबाबूंना “नेताजी’ हे संबोधन मिळाले. आज आपण मोठ्या गौरवाने देत असलेला “जयहिंद’ हा नारा देण्यास सुभाषबाबूंनी प्रथम सुरुवात केली. 11 ऑगस्ट 1942 या दिवशी हॅंबुर्ग येथे इटली, जपान, थायलंड, हॉलंड, बेल्जियम अशा अकरा देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हिंदुस्थानचा तिरंगी झेंडा फडकला व जन गण मन या राष्ट्रगीताचे सूरही निनादले. त्यानंतर जपानचे पंतप्रधान टोजो यांच्या आमंत्रणावरून, पाणबुडीतून तीन महिन्यांचा अत्यंत खडतर प्रवास करून नेताजी टोजोंना भेटले. जपानी संसदेपुढे नेताजींचे भाषण झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संपूर्ण लष्करी सहाय्य देण्याचे जपानने मान्य केले. सिंगापूरच्या सभेमध्ये आझाद हिंद सेनेत भरती होण्यासाठी एकच गर्दी उसळली. महिलांसाठी झाशीची राणी पथक उभारण्यात आले. निरनिराळ्या देशातून सिंगापूर येथे एक हजार प्रतिनिधी जमले. त्यांच्यासमक्ष नेताजींनी हिंद सरकारचे मंत्रीमंडळ जाहीर केले व देश स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. जपानने त्यांच्या ताब्यातील अंदमान आणि निकोबार ही बेटं आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. जपानच्या सेनेसमवेत आझाद हिंद सेना पुढेपुढे सरकत होती. मणिपूर व आसामचा काही भाग आझाद हिंद सेनेच्या ताब्यात आला. नेताजींनी जाहीर केलं की, एकदा शत्रूला हिंदुस्थानातून पिटाळून लावले की, आम्ही बाजूला होऊ व मग लोकांनीच लोकशाही पद्धतीने त्यांचे सरकार निवडावे.
इंफाळ म्हणजे हिंदुस्थानचे पूर्वेकडचे प्रवेशद्वार. त्यामुळे इंग्रजांनी तिथला बंदोबस्त प्रचंड प्रमाणात वाढवला. नेताजींनी सारासार विचार करून जपानच्या लष्करी प्रमुखास दिमापूरच्या रोखाने जाण्यास सुचवलं. परंतु मुतगुची हट्टाला पेटला. भयानक पाऊस सुरू झाला. तीन महिने मुतगुची सर्व सैन्यानिशी तिथेच हटून राहिला. सैन्याची वाताहत झाली. इटली व जर्मनी पडले. जपानची पिछेहाट सुरू झाली. अखेरीस सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली. सगळेच फासे उलटे पडले. नेताजींनी युद्धगुन्हेगार म्हणून इंग्रजांच्या हातात सापडू नये अशी त्यांच्या अनुयायांची इच्छा असल्याने खूप आग्रह करून नेताजींना मांचुरियास जाण्यास त्यांनी तयार केले. मात्र विमानाने आकाशात झेप घेताच त्याने पेट घेतला व सर्वजणांच्या कपड्यांना आग लागली. 22 ऑगस्ट 1945 या दिवशी नेताजींच्या निधनाची वार्ता जाहीर झाली. त्यांचे अखेरचे शब्द हेच होते, “मी अखेरपर्यंत झुंजलो. हिंदुस्थान स्वतंत्र होणार – लवकरच!’ हिंदुस्थान खरेच स्वतंत्र झाला पण तो पाहण्याचे, स्वातंत्र्य उपभोगण्याचे भाग्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लाभले नाही.
माधुरी तळवलकर