नगर – केडगावमधील पुणे रस्त्यावरील हॉटेल अर्चना ते नेप्ती उपबाजार समितीला जोडणारा नेप्ती रस्ता तसेच भूषण नगर चौक ते कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या लिंक रोडची ठिकठिकाणी पडलेलेल्या खडड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे.
या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने खराब रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक विजय पठारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत यांना नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, बबलु शिंदे, प्रफुल्ल साळुंके, तुषार भोसले, युवराज घुले, सनी काळे, चेतन राऊत, चेतन वर्मा, नयन गायकवाड, दिनेश हजारे, दत्तात्रय कुटे, विकी भालेराव, सागर थोरात, दिपक औताडे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले.
यामध्ये म्हटले आहे की, केडगाव येथील नगर – पुणे हायवेवरील हॉटेल अर्चनापासून केडगाव बायपास, कांदा मार्केट चौकाला जोडणाऱ्या नेप्ती रोडची अवस्था बिकट झालेली आहे. नेप्ती रोडच्या दोन्ही बाजुला नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असून कांदा मार्केट, केगावमधील उपनगराकडे येण्या जाण्याकरीता नागरीक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत सदरील रस्त्यास मोठ खड्डे पडलेले आहेत.
रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यामधील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे परिसरातील बऱ्याच नागरिकांना याचा खुप त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तसेच भूषणनगर चौक ते कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या लिंक रोडची ठिकठिकाणी पडलेलेल्या खडड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने खराब रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.