भारत-नेपाळ सीमेवर पुढील दहा दिवस हाय अलर्ट जारी
नवी दिल्ली : देशात सध्या दिवाळ सणाची धामधुम सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना या उत्साहाला दहशतवाद्यांकडून छेद लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दहशतवादी नेपाळच्या सीमाभागातून देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयीची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे त्यामुळे आता नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या सर्व राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पिथौरागडचे पोलिस अधीक्षकांनी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला आहे. पिथौरागड जिल्ह्यात काली नदी भारत आणि नेपाळच्या सीमेचे विभाजन करते. सुमारे 180 किमी लांबीच्या सीमेवरून सहा झुलापुलांद्वारे वाहतूक केली जाते. रोटी-बेटीसाठी दोन्ही देशांचे लोक कुठल्याही अडथळ्याशिवाय या सीमेला भेट देतात. दरम्यान, या सर्वांत सीमेवर संशयास्पद असणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एसएसबी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरीच्या विविध प्रयत्नांमध्ये गुंतले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव कायम आहे. दिवाळीच्या उत्सवात दहशतवादी नेपाळमार्गे भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या या अहवालानंतर सुरक्षा संस्था सक्रिय झाल्या आहेत.