आळंदी (वार्ताहर) – ना गावकरी, ना वैष्णव केवळ 50 निमंत्रित पासधारकांच्या उपस्थितीत अतिशय शांतता, भक्तिमय आणि शासकीय नियमांच्या अधीन राहून माउलींचे प्रस्थान शनिवारी पार पडले.
पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते पवमान पूजा करण्यात आली. सकाळी 10 ते 12 हभप अवधूत महाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. मंदिरात अतिशय सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी एकच्या सुमारास मोजक्या बृह्मवृंदांच्या उपस्थित संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर अतिशय सुंदर डोळ्याचे पारणे फिटेल अशी पूजा आणि सजावट करण्यात आली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक आणि शितोळे सरकार यांच गाभाऱ्यात आगमन झाल्यानंतर आरती होऊन ऍड. विकास ढगे पाटील आणि पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई यांनी माउलींच्या चल पादुका पालखी सोहळा मालक ाळासाहे आरफळकर-पवार यांच्याकडे सोपविल्या. त्यानंतर आरफळकर-पवार हे चल पादुका घेऊन विणा मंडपात आले. येथे फुलांनी सजवलेल्या चौरंगावर त्या पादुका विराजमान केल्यानंतर देव संस्थानमार्फत संस्थानच्या सर्व मानकऱ्यांना पागोटे आणि नारळ तर पालखी सोहळा मालक यांच्या हस्ते विश्वस्त मंडळ, मानकरी, दिंडीप्रमुख यांना नारळ वाटप करण्यात आले. माउलींची आरती सुरू झाली.
त्यानंतर माउलींची पालखी समस्त आळंदीकर युवक “माउली, माउली’चा जयघोष करीत खांद्यावर घेत असतात; परंतु यावर्षी पालखीमध्ये चल पादुका न ठेवता पालखी सोहळा मालक ाळासाहे अरफाळकर यांनी पादुका हातात घेऊन मंदिरात ज्ञानोबा माऊलीच्या हरिनामाच्या गजरात प्रदक्षिणा पार पडली. पश्चिम दरवाजातून पादुका आजोळघरी आणल्यानंतर गांधी परिवाराच्या वतीने आरती होऊन पालखी सोहळा विसावला. तर आता दशमीपर्यंत माउलींच्या चल पादुका तेथेच वास्तव्यास असणार आहेत. दशमीला हेलिकॉप्टर किंवा उपलब्ध वाहनातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.