पाटण – राज्याच्या जडणघडणीत पाटण तालुक्याचा मोठा वाटा आहे. असे असतानाही पाटणच्या डोंगरदुर्गम भागात आजही मुलभूत सुविधांचा वनवा आहे. येथील शहरी भागाला नागरी सुविधा देण्यात नगरपंचायतीला सपशेल अपयश आले आहे. पाटण शहरातील वाढती लोकसंख्या व बदलते राहणीमान पाहता लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
मात्र, नगरपंचायतीच्या नगराक्षांना गाडी नाही तर कचरा उचलण्यासाठी सुसज्ज अशी घंटागाडी नाही, अशी नगरपंचायतीची अवस्था आहे. स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई व माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा पाटण तालुक्याला आहे. आणि सध्यातर पाटणचे सुपूत्र शंभूराज देसाई राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री आहेत. परंतू तालुक्यातील महत्वाची शासकीय कार्यालयांची दुरावस्था झाली आहे.
तालुक्याचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर राहणीमानही बदलत आहे. त्यामानाने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मुलभूत सोयी-सुविधा आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न सतत ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे नगरपंचायतीचे जुने कार्यालय नादुरुस्त असल्याने येथील कार्यालयीन कामकाज नगरपंचायतीच्या बाजार गाळयात हलवावे आहे. त्यामुळे पाटण नगरपंचायत नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.
पाटण शहरात सद्यस्थितीला सुमारे वीस हजार लोकवस्ती आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने पाटण येथे दर सोमवारी आठवडा बाजार भरतो. तसेच सर्व शासकीय कार्यालये पाटण शहरात असल्याने स्वच्छता आणि पाणीपुरवठा या कामाला प्रथम प्राधान्य देणे, हे नगरपंचायतीचे कर्तव्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. पाटण ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन तीन वर्ष झाली तरीही नगरपंचायतीच्या भौतिक आणि आर्थिक स्थितीत म्हणावी तितकी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची सतत ओरड सुरू आहे.
पाटण नगरपंचायत माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मानणारी आहे. पाटणकर गटाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची एकहाती सत्ता आहे. असे असलेतरी नगरपंचायतीच्या परिसरात कचरा निर्मूलन आणि सुरळीत पाणीपुरवठा करणे, हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. आणि यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्नही तोकडे पडत आहे. तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना वाहन तसेच कचरा उचलण्यासाठी सुसज्ज घंटागाडीची सोयही अद्याप झालेली नाही.
पाटण शहराच्या विकासासाठी नगर पंचायतीला राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालय किंवा इतर हेड मधून मुबलक निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र असे होता दिसत नाही. त्यामुळे शहरातील लोक आणि विविध सामाजिक संघटना नगरपंचायती विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत.
पाटण तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यामुळे पाटण तालुक्यातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ना. शंभूराज देसाई यांनी पाटण शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांना नव संजीवनी देण्याची गरज आहे. तालुक्याच्या ठिकाणची मोडखळीस आलेली शासकीय कार्यालये पाटणच्या नावलौकीला बट्टा लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे ना. देसाई यांनी तातडीने अशा कार्यालयांची पुर्नबांधणी करावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून जोर धरत आहे.
पाटण नगरपंचायत झाल्यापासून आजअखेर पाटण शहरातील रस्ते असो किंवा पाणीपुरवठा आणि इतर कामांसाठी पाच कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यालय बंद केले आहे. त्यामुळे नगर पंचायतीचा कारभार तात्पुरता येथील नगरपंचायतीच्या बाजार गाळ्यामध्ये हलवण्यात आला आहे. लवकरच नगरपंचायत इमारतीचे बांधकाम सुरु होईल.
संजय चव्हाण, नगराध्यक्ष