मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
लोकायत आणि संविधान बचाव मंचकडून रॅलीचे आयोजन
पुणे – शिवरायांचा विरोधक मुसलमान की ब्राम्हण असा विखारी प्रश्न निर्माण करून काही विद्वानांनी स्वतःच्या मेंदूतील जातजाणीव इतिहास लेखनातून पेरली. त्यामुळे इतिहासही दुभंगला आणि महाराष्ट्रही दुभंगला. स्वराज्याचे शत्रू जे मुसलमान, ब्राम्हण, मराठे होते तेच शिवाजी महाराजांचेही शत्रू होते. आणि म्हणूनच जात-धर्म न पाहता महाराजांनी शत्रूला ठार केले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी व्यक्त केले.
लोकायत आणि संविधान बचाव मंचाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले वाडा ते गोळीबार मैदान या रस्त्यावर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकायतच्या अलका जोशी आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीनंतर झालेल्या सभेत सबनीस आणि लोकायतच्या अलका जोशी यांनी भाषण केले.
महाराज हिंदू धर्मात जन्मले पण त्यांचे राजकारण धर्मनिरपेक्ष होते, म्हणून तर दौलतखान, इब्राहिमखान, नूर बेग सारखे मुस्लिम अधिकारी स्वराज्य निष्ठेत रमले. शिवाजी राजे हे एकात्म महाराष्ट्राचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राला जोडून ठेवणारा विषय आहे. पण आज छत्रपतींचा महाराष्ट्र धर्मवादात होरपळतो आहे. अठरापगड जातींचा महाराष्ट्र हाच खरा महाराष्ट्र, तरच शिवरायांचा जयघोष अर्थपूर्ण ठरेल, असेही सबनीस यांनी नमूद केले.
सध्या एनपीआर, एनआरसी प्रक्रियेद्वारे आणि सीएए सारखा संविधानाची मोडतोड करणारा कायदा म्हणून धर्माधिष्ठित राजकारण केले जात आहे. पुढे संविधानात आलेल्या स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या महाराजांच्या मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. रोजच्या जगण्याच्या प्रश्नांशी काडीचाही संबंध नसलेले विषय उपस्थित करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न आहे. विद्वेषाच समाजकारण करण्यासाठी कायमच इतिहासातील थोर पुरुषांना वेठीला धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आणि त्यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या विचारधारा यांना विकृत वळण देण्याचे काम केले जात असल्याची टीका अलका जोशी यांनी केली.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते यावर पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी 22 वर्षांपूर्वीच बजावली आहे, त्यामुळे हे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याची अत्यंत गरज आहे, असे मतही जोशी यांनी व्यक्त केले.