अकोले -करोनाच्या युद्धात लढणारे महावितरणचे कर्मचारीही चोवीस तास सेवा देऊन आपला सहभाग उचलत आहेत. मात्र इतर शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामाचे जसे कौतुक होत आहे, तसे कौतुक मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या नशिबी आलेले नाही. ते अद्यापही या आणिबाणीच्या काळात दुर्लक्षितच असल्याची खंत या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून बोलून दाखवली जात आहे.
करोनाशी सध्या संपूर्ण जग लढत असून, त्यासाठी लॉक डाऊनचा पर्याय सर्वांत प्रभावी ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील लक्षावधी जनतेला घरात बसून ठेवण्यासाठी अखंडित वीजपुरवठा सुरू राहावा म्हणून अविरतपणे चोवीस तास कार्यरत असणारा महावितरण कंपनीचा कर्मचारी समाज, सोशल मीडिया, पत्रकार यांच्याकडून दुर्लक्षित व उपेक्षित राहात असल्याचे दिसत आहे.
करोनाशी लढणारे महसूल प्रशासन, सफाई कामगार, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांची सर्व स्तरातून दखल घेतली जात आहे. ही दखल घेण्यासाठी ते पात्र देखील आहेत. लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहावे लागत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी लॅपटॉपवर वर्क फ्रॉम होम करीत आहेत. कोणी दूरदर्शनवर मनोरंजन मालिका, बातम्या, सिमेना पाहून वेळ व्यतीत करीत आहेत. तरुण पिढी मोबाईलवर सोशल मीडियाचा वापर करून जगाशी संपर्कात आहेत. लहान मुले कार्टून फिल्मचा आस्वाद घेत आहेत. गर्मीच्या वातावरणात कूलर, एसी व पंख्याखाली बसत आहेत. मात्र महावितरणचे कर्मचारी त्यासाठी चोवीस तास राबत आहेत.
त्यामुळेच नागरिकांचे घरात बसणे सुसह्य बनत आहे. मात्र या सर्वांसाठी वीजपुरवठा अखंडित ठेवून जनतेला घरात थाबाने सुसह्य करणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी, कंत्राटी कामगार ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील, असे स्पष्ट करून या सर्व धामधुमीत महावितरणचे कर्मचारी दुर्लक्षित राहिला आहेत, अशी सल व्यक्त होत आहे.
लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज कर्मचारी व अभियंते कार्यरत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी महावितरणला सहकार्य करून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार घरातच थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप भाटे यांनी केले आहे.