लाभार्थींच्या यादीसह लाभा मिळावा यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन
राजगुरूनगर- खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेसाठी तालुक्यातील सुमारे 40 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले; मात्र या योजनेत अगदी नगण्य शेतकऱ्यांची नावे आली असून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. महसूल विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळावी व या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शेतकरी प्रतिनिधी देविदास बांदल यांच्यासह शेतकऱ्यांनी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खेड तालुक्यात पंतप्रधान सन्मान (पीएम किसान) योजनेसाठी सुरुवातील सुमारे 40 हजार शेतकऱ्यानी अर्ज भरून दिले होते. त्यानंतर सरकारने सरसकट शेतकऱ्यांचे अर्ज घेण्याचे महसूल प्रशासनाला कळवले पाच एकरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी त्यानंतर अर्ज भरून दिले. तालुक्यात जवळपास 70 हजारपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचे लाभार्थीं आहेत प्रत्यक्षात;मात्र काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांना सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत.
प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड केले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. योजनेसाठी अर्ज भरून घेतले; मात्र ते उपलोड न केल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. त्या सर्वांना लाभ देण्यासाठी अजूनही मुदत असल्याने आणि प्रशासनाकडून त्याबाबत काळजी घेतली जात नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांची यादीत नावेच नसल्याचे समोर आले आहे. त्याचे अर्ज भरून घेतले ते कोठे गेले असा प्रश्न शेतकरी विचार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रशासनाकडून भरले गेले नाहीत. जे भरले त्याची माहिती चुकीची भरली असल्याने शेतकरी लाभापासून दूर आहेत.
- या आहेत मागण्या
तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेसाठी अर्ज भरले?
किती शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली किती शेतकऱ्यांची होणे बाकी आहे?
किती शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे?
किती शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक चुकीचे आहेत, याबत प्रशासनाने कोणती कारवाई केली. त्यात दुरुस्त्या झाल्या का?
गावनिहाय किती शेतकऱ्यांनी अर्ज भरले?