NEET-UG paper leak: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG) परीक्षा अखेर मंगळवारी रद्द करण्यात आली. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि पेपरफुटी झाल्याच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता, सरकारने याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला असून सीबीआयने याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) स्पष्ट केले आहे की, परीक्षेच्या नव्या तारखा येत्या ७ ते १० दिवसांत जाहीर केल्या जातील. या निर्णयामुळे परीक्षेला बसलेल्या २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी टांगले असून, देशभरातून संताप व्यक्त होत आहे. सीबीआयकडून गुन्हे दाखल, राजस्थानात धागेदोरे – सीबीआयने याप्रकरणी गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह नवीन ‘सार्वजनिक परीक्षा प्रतिबंधक कायदा २०२४’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने (SOG) दिलेल्या माहितीनुसार, केमिस्ट्रीचा एक ‘गेस पेपर’ परीक्षेपूर्वीच फिरत होता, ज्यातील ४१० प्रश्नांपैकी तब्बल १२० प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. याप्रकरणी महाराष्ट्रातील नाशिकमधूनही एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमधील संशयित सीबीआयच्या ताब्यात – पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी रात्री नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताला आपल्या ताब्यात घेतले. शुभम खैरनार (वय ३०, रा. नांदगाव, जि. नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त किरणकुमार चौहान यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनंतर संबंधित संशयिताला पुढील तपासासाठी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. विद्यार्थी संतप्त; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल – परीक्षा रद्द झाल्याची बातमी समजताच वैद्यकीय इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. “एनटीएची कार्यक्षमता शून्य असून ही परीक्षा आता एम्स-दिल्लीमार्फत (AIIMS) घेण्यात यावी,” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. “पंतप्रधान मोदींचा ‘अमृतकाळ’ युवकांसाठी ‘विषकाळ’ ठरला आहे. २२ लाख विद्यार्थ्यांचे कष्ट आणि स्वप्ने या भ्रष्ट व्यवस्थेने चिरडून टाकली आहेत.” – राहुल गांधी “हे सरकार फक्त आंदोलनाची भाषा समजते. विद्यार्थ्यांनी आता रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे.” – अरविंद केजरीवाल “फेरपरीक्षा घेतली तरी पेपर पुन्हा फुटणार नाही याची गॅरंटी काय?” असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. ‘एनटीए’ची बाजू आणि फेरपरीक्षेची तयारी – एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. “पेपरफुटीचे सत्र आता थांबलेच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी आम्ही ही परीक्षा रद्द करत आहोत. ही संपूर्ण यंत्रणेसाठी चिंतेची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे: १. फेरपरीक्षेसाठी नवीन नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. २. जुन्याच अर्जाच्या आधारे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल. ३. परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. दरम्यान, यापूर्वी २०१४ आणि २०२४ मध्येही नीट परीक्षेवरून मोठे वाद निर्माण झाले होते. आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा पेपरफुटीचा डाग लागल्याने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.