नवी दिल्ली – भारतातील बॅंकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या बाजूने भारतातलेच एक माजी न्यायाधीश साक्ष देणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू ब्रिटनच्या न्यायालयात मोदीच्या बाजूने साक्ष देणार आहेत. त्यांनी स्वत:च एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे.
उद्या अर्थात शुक्रवारी काटजू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही साक्ष देणार आहेत. नीरवला भारतात न्याय मिळणार नाही, एवढेच आपण सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करणारी याचिका भारताने ब्रिटनच्या न्यायालयात दाखल केली आहे. मात्र आपली भूमिका त्यापेक्षा वेगळी असल्याचे काटजू यांचे म्हणणे आहे.
ते म्हणाले की, आपण अगोदरच तेथील न्यायालयाने एक लेखी उत्तर पाठवले आहे. भारतातील प्रसार माध्यमे आणि सरकारने अगोदरच मोदीला दोषी ठरवले असल्यामुळे मोदीला भारतात एका स्वतंत्र आणि निष्पक्ष सुनावणीची संधी मिळणार नाही, असे आपण कळवले असल्याचे काटजू म्हणाले.
भारताचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तर एका पत्रकार परिषदेतच नीरव मोदीला दोषी घोषित केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एखाद्याला आरोपीला दोषी ठरवण्याचे काम न्यायालयाचे आहे. कोणते कायदा मंत्री असे दोषी ठरवू शकतात? आपले कायदा मंत्री थेट निर्णय घोषित करत आहेत, असेही काटजू यांचे म्हणणे आहे.
भारतातील न्यायालयांचा हल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कल झुकलेला दिसतो असा दावाही काटजू यांनी काही काळापूर्वी केला होता. अयोध्येतील मंदिर- मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लाजीरवाणा असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहेत. नीरवने 6498 कोटी तर चोक्सीने 7080 कोटी रूपयांचा अपहार केल्याचा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे. सीबीआयचा तपास सुरू होण्याच्या अगोदरच दोन्ही आरोपी देशातून पसार झाले आहेत. आता त्याच नीरव मोदीच्या बाजूने न्या. काटजू साक्ष देणार आहेत.