हरियाणा – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीतील सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा याच्या प्रकृतीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता त्यात त्याच्यावर उपचार करत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नीरजला संपूर्ण आरामाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मायदेशात आगमन झाल्यावर तब्बल 10 दिवसांनी तो पानिपत येथे दाखल झाला होता. त्यानंतर त्याची हल्दाना बॉर्डर येथून रॅली काढण्यात आली आणि ती त्याच्या गावी खंदारा येथे पोहोचली.
खंदारा येथे नीरजचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम सुरू असतानाच नीरजची तब्येत बिघडली व लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्याने घरी आल्यावर आपल्या पालकांसमवेत सुवर्णपदक झळकावत फोटोही काढला व तो सोशल मीडियावर पोस्टही केला.
मात्र, गेल्या 10 दिवसांत त्याची प्रचंड धावपळ झाली असून त्याला आता पुढील काही दिवस पूर्ण आरामाची गरज आहे, असेही या तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याची करोना चाचणीही करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.