Neelam Gorhe : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोऱ्हे या गेल्या काही वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत असल्याचा दावा देसाईंनी केला आहे. या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण – “गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲड. श्रीपाद देशपांडे आणि माझी आई लतिकाताई गोऱ्हे व शास्त्रज्ञ वडील डॅा. दिवाकर गोर्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, त्याचे मी काटेकोरपणे पालन करत आले आहे. “कोणत्याही ढोंगी, ‘गुरूचा’ अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही,” हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थ , साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्री दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले .मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते . राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक ‘गुरू’ची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही. नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीड, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे.याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभे राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील.” - डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेना नेत्या, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद