नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची लक्षवेधी सूचना आ. विद्याताई चव्हाण यांनी मांडली.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात मागील सरकार सपशेल अपयशी कसे ठरले, याचा खुलासा व्हावा अशी मागणी सभागृहात करताना विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, सध्यास्थिती पाहता महिला व बाल अत्याचार रोखण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. पोलिस प्रशासनाकडे महिला मदत मागण्यासाठी आल्यानंतर अनेक उर्मटपणे उत्तरे दिली जातात. यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याची गरज असून लहान मुलींनाही त्यांच्या स्वरक्षणासाठी शिबिर घेण्याची गरज आहे.
शिवाय, मोबाईलवर मुलींना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगमध्ये अनेकदा शिवीगाळ केली जाते. बऱ्याचदा अनेक अश्लील व्हिडिओ मोबाईलवर बघण्यात येतात. यासाठी प्रसानाकडून कठोर बंधने घालण्याची तरतूद व्हावी. त्याचप्रमाणे बेपत्ता झालेल्या किती मुलींचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला, याबाबत राज्यशासन सक्षम आहे का, याची माहिती मिळण्याची मागणी विद्याताई चव्हाण यांनी केली.