जालना – देशातील आणि राज्यातील करोनाचा धोका आता काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. पण रशिया, चीन आणि इंग्लंड या देशांमध्ये करोनाच्या संकटाने पुन्हा एकदा तोंडवर काढले आहे.
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जालना येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेश टोपम म्हणाले, देशातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना जगभरातील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.
रशिया, इंग्लड आणि चीनमध्ये पुन्हा करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच आयसीएमआरने याबाबत नियमावली ठरवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनमध्ये करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे चीनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार सर्वप्रथम चीनमध्ये झाला होता, त्यानंतर जगभराला त्याचा सामना करावा लागला होता. ब्रिटन आणि रशियामध्येही करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला होता. आता तिसऱ्या लाटेनेही तोंड वर काढले असून या देशांमध्येही काही भागांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवाळी साजरी करताना नागरिकांनी करोनाचे भान ठेवावे. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.