मुंबई – भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आता अन्नधान्याच्या ऐवजी ऊर्जा निर्मितीकडे भर देण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये ऊर्जेचा तुटवडा आहे. तो तुटवडा भरून करण्यासाठी शेतीची मदत घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.
मुंबईचा कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केल्या नंतर बोलताना गडकरी यांनी सांगितले की, भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. त्यासाठी भारत दरवर्षी पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनाच्या आयातीसाठी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो. हे चित्र बदलण्यासाठी भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्यासाठी देशांतर्गत कच्चे तेल शोधण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या ऊर्जेसाठी वापर वाढविण्याची गरज आहे.
ऊर्जा क्षेत्राने पर्यायी इंधन विकसित करण्यावर विचार करण्याची गरज आहे. भारतातील 65 ते 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून असूनही राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा केवळ 15 ते 20 टक्के आहे. हा विरोधाभास कमी करण्याची गरज आहे. शेतीचे राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेची निर्यात करण्याऐवजी साखरेचा इतर कारणासाठी वापर वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी अन्नधान्याबरोबरच ऊर्जेचे उत्पादन करीत असल्याचे चित्र निर्माण होईल. भारताला 280 लाख टन साखर लागते. मात्र भारतामध्ये 360 लाख टन साखरेची निर्मिती होते.
उरलेल्या साखरेपासून इथेनॉल करण्यावर सरकार भर देत आहे. गेल्या वर्षी 400 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. यामुळे भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयात कमी प्रमाणात करावे लागेल. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. इथेनॉलच्या आधारावर विमान व रेल्वे चालवली जाऊ शकते अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Need to increase energy generation from agriculture – Nitin Gadkari)