मुंबई – देशात सध्या इंधनाच्या वाढत्या दरावरून जनसामान्य माणसांत रोष आहे. सद्य परिस्थिती पाहता आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ आली आहे. मी आधीपासूनच विजेचा इंधन म्हणून वापर करण्याचा प्रसार करत आहे. कारण भारतात अतिरिक्त विजेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
तसेच, आपण भारतात 81 टक्के लिथियम बॅटरी बनवत आहोत. माझ्या मंत्रालयाने आज लिथियम आयनला पर्याय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारशी संबंधित सर्व प्रयोगशाळा यावर संशोधन करत आहेत. इंधनासाठी मंत्रालय हायड्रोजेन सेल्सच्या पर्यायाची देखील चाचपणी करत आहे, असे देखील गडकरींनी यावेळी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जातात. अनेक वादग्रस्त प्रकरणांवर त्यांनी आपली अशी वेगळी भूमिका मांडली आहे. मग तो देशातल्या राजकीय वादांचा मुद्दा असो किंवा त्यांच्या स्वत:च्याच पक्षातील चुका असोत. त्यावर बोट ठेवण्यात नितीन गडकरी कधीही मागे हटलेले नाहीत.
आता देखील देशात जोरदार चर्चा असलेल्या मुद्द्यावर गडकरींनी आपली भूमिका मांडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असताना आता नितीन गडकरींनी त्यावर भूमिका मांडली आहे.
दरम्यान, महिन्याभरात किमान 10 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या 8 दिवसांमध्ये तर रोज या किंमती वाढतच आहेत. दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये लिटर तर मुंबईत हाच दर 95.75 रुपये लिटरपर्यंत पोहोचला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत पेट्रोलचे दर 2 रुपये 99 पैशांनी वाढले आहेत. तर मुंबईत पेट्रोल तब्बल 3 रुपये 22 पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.