मुंबई – सिमेंट आणि पोलाद कंपन्या साखळी करून दरवाढ करतात. त्यामुळे सर्वसामान्याबरोबरच पायाभूत क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. यासाठी या क्षेत्रावर नियंत्रकांची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, जर पंतप्रधानांच्या इच्छेप्रमाणे भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील. मात्र पायाभूत सुविधा साठी आवश्यक सिमेंट आणि पोलाद या कंपन्यांनी साखळी करून महाग करून ठेवले आहे. या क्षेत्रात 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील क्रेडाई आणि इतर संघटनांनी एक सिमेंट आणि पोलाद कंपन्यांवर साखळी केल्याचा आरोप केलेला आहे. आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयातील सचिवाची प्रदीर्घ चर्चा केली आहे.
भारतातील पोलाद कंपन्यांच्या स्वतःच्या खाणी आहेत. वीज महाग झाली नसतांना आणि कामगाराचे वेतन वाढले नसताना पोलाद कंपन्या कशी काय दरवाढ करीत आहेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली. सिमेंट आणि पोलाद कंपन्या सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. त्यांची वर्तणूक देशाच्या हिताच्या विरोधात आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून या क्षेत्रावर नियंत्रक नेमणे मार्ग असू शकतो. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.