मुंबई – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 70 वर्षात इतर क्षेत्राच्या तुलनेत या क्षेत्राकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्र दुर्लक्षित राहिले. गेल्या 57 वर्षांत केवळ 87 अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालये देशभरात उभारली गेलीत. मात्र, तातडीची वैद्यकीय सुविधाआयुष्मान भारत आणि केंद्र सरकारच्या अन्य योजनांद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी आणखी 500 पेक्षा अधिक अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालये देशभरात उभारली जाण्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च’च्या नव्या शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन आणि निवासी संकुलाचे भूमिपूजन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते पनवेल येथे आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर देशभरात महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये 75 वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या 650 ते 700 वैद्यकीय महाविद्यालये आणि भारतातील विविध आरोग्य संस्था सार्वजनिक आरोग्यासाठी काम करीत आहेत, त्यांनी जनतेपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी भरीव कामगिरी केली पाहिजे. सध्या देशातील 700 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 7000 सामाजिक आणि प्रतिबंधात्मक उपायांचे विभाग आहेत, ज्यात प्रत्येक विभागाचे 7 प्राध्यापक आणि 5000 प्रशिक्षित प्राध्यापक आहेत, हे संख्याबळ प्रतिबंधात्मक औषधे आणि सामाजिक समस्यांसाठी वापरले गेले तर भारत आपले लक्ष्य साध्य करू शकेल. इबोला आणि करोना विषाणूचा मृत्यूदर कमी करण्यासाठी कार्य करू शकणाऱ्या रोबोट नॅशनल सर्व्हायलन्स सिस्टीमची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सर्व सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, आणि देशातील इतर डॉक्टरांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य विषयक कल्पना आणि ते कशा प्रकारचे सहयोग द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.