नवी दिल्ली – श्रीमंतांसाठी तुम्ही 8 एअरबॅग देता. मग स्वस्त कारसाठी ज्या सर्वसामान्य नागरिक वापरतात त्यांना फक्त 2-3 एअरबॅग देता, असे का? असा सवाल नितीन गडकरी यांनी कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विचारला आहे.
कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ श्रीमंतांच्या महागड्या कार्समध्ये आठ एअरबॅग्स उपलब्ध करुन देतात. मात्र सर्वसामान्य नागरिक लहान कार खरेदी करतात. या कारमध्ये मात्र केवळ दोनच एअरबॅग्स असतात, यावरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. लहान कारमध्ये देखील पुरेशा एअरबॅग असाव्यात अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केली आहे.
नितीन गडकरी यांनी म्हटले की, सर्वसामान्य नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेत असतात आणि त्यांच्या कारमध्ये सुरक्षेसाठी पुरेशा एअरबॅग नसल्यास आणि अपघात झाल्यास त्यांना आपला जीव गमावाव लागू शकतो. म्हणून मी सर्व कार उत्पादकांना आवाहन करतो की वाहनाच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये किमान 6 एअरबॅग दिल्या जाव्यात. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकरही सुरक्षित प्रवास करु शकतील.
एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.