डॉ. मेघश्री दळवी
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दर वर्षी 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येतो. या मातीतून पिकलेलं अन्नधान्य आपण खातो. तिच्यातलं बरं-वाईट हे अन्नातून आपल्या शरीरात जातं. त्यामुळे या मातीची आपल्याला नीट ओळख व्हावी आणि टिकाऊ (सस्टेनेबल) पद्धतीने आपण जाणीवपूर्वक मातीचा वापर करावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
पाण्याची टंचाई जगभर जाणवू लागली आहे, दूषित हवेने होणारे आजार वाढत चालले आहेत. मातीही आपल्या आयुष्यातली अशीच एक अत्यावश्यक घटक. पण मातीकडे त्या प्रमाणात विशेष लक्ष दिले जात नाही. जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने मात्र मातीशी संबंधित अशा अनेक पैलूंचा विचार होत राहतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्लोबल सॉइल पार्टनरशिप कार्यक्रमांतर्गत म्हणूनच डिजिटल सॉइल मॅपिंग, सॉइल इन्फॉर्मेशन सिस्टम, गाइडलाइन्स फॉर सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंट अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
मृदा किंवा माती म्हटली, की आपल्याला पटकन शेतातलीच आठवते. या मातीत असलेली पोषक द्रव्यं तिच्यातून निघणाऱ्या पिकात पोचतात. मात्र आजविविध प्रकारच्या प्रदूषणामुळे मातीतून निकृष्ट दर्जाचं धान्य निघत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पुरवताना एकामागोमाग एक पिकं घेतली जात आहेत. कीटकनाशकं, तणनाशकं वापरून पिकं वाचवताना मातीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी मातीचं नियमित परीक्षण करून तिच्यातील पोषक द्रव्यं वाढवण्याचा प्रयत्न आवश्यक असतो. हा प्रयत्नदेखील शक्यतो कृत्रिम खतं न वापरता नैसर्गिक पद्धतीने व्हावा असा आग्रह टिकाऊ (सस्टेनेबल) शेतीत असतो. एखाद्या परिसरात पक्षी, प्राणी, कीटक यांचा समतोल असेल, तर मातीला नैसर्गिकरीत्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होत राहतो. मातीचा कस राखून ठेवण्यासाठी काही पारंपरिक युक्त्या आहेत, तर काही आधुनिक संशोधनातून मिळालेल्या क्लृप्त्या आहेत.
नैसर्गिक परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टम) शेतीपलिकडेही मातीचा सहभाग असतो. मातीत झाडाझुडुपांची मुळं ठाम रुजलेली असतील तर पावसाच्या माऱ्यातही ती तग धरून राहते, वाहून जात नाही. सोबत पाणी शोषून जमिनीखालील पाण्याचा साठा वाढवण्यात तिची मदत होत असते. या गोष्टींकडे वेळेवर लक्ष दिले नाही, तर मातीची धूप होऊन खालील खडकाळ जमीन उघडी पडू शकते आणि परिसर उजाड होऊ शकतो. प्लॅस्टिकच्या अतिवापराचा फटकाही मातीला बसतो. प्लॅस्टिक कचरा साचत गेला तर दोन पातळ्यांवर तोटा होतो. एक तर प्लॅस्टिकचा दर्जा चांगला नसेल तर त्यांच्यामधील घातक रसायनं मातीत मिसळतात. दुसरा धोका आहे तो प्लॅस्टिकमुळे पाणी खोलवर झिरपू न शकण्याचा.
आज हवामान बदल आणि प्रदूषण यांना सामोरं जाताना निसर्गाच्या चक्रात मातीचं स्थान काय आणि तिचं आपण काळजीपूर्वक कसं संवर्धन करावं यावर भर आहे. हेच या जागतिक मृदा दिवसाचं महत्त्व.