नागपूर – कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे आहे. नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम,अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. दत्तात्रय वाटमोडे उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले, आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथपर्यंत कडवी संरक्षण विषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रक्षा, आंतरिक कौशल्य या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भविष्यात गुंतवणूक होणाऱ्या नागपूरसारख्या शहरात यासाठी अभ्यासक्रम सुरू होते, ही अभिमानास्पद बाब आहे.
नागपूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या परिसरात पुढील काळात संरक्षण विषयक निर्मिती क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कौशल्ययुक्त मनुष्यबळासोबतच संरक्षण तज्ज्ञही विद्यापीठात घडावे. अभियंते, तंत्रज्ञ, अभ्यासकही निर्माण व्हावे. यासाठी विद्यापीठाला निधीची कमी पडू देणार नाही.
गरज पडल्यास देश-विदेशातून निधी उभारल्या जाऊ शकतो. मात्र देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे अतिशय आवश्यक असून त्यादृष्टीनेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात आहे. नागपूर विद्यापीठ एकूण 11 नवे अभ्यासक्रम सुरू करीत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.