बेंगळूर – करोनाचा धोका संपला तरीही खेळाडूंना सातत्याने परदेश प्रवास करणे टाळावे लागेल. करोना विषाणूंचा धोका उलटू शकतो ही भीती अजून काही महिने तरी राहणार त्यामुळे पुढील काळात होत असलेल्या स्पर्धांबाबत अत्यंत अचूक नियोजन करण्याची गरज आहे, असे मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.
करोनाचा नायनाट जरी झाला तरी हा धोका पुढे होणारच नाही अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. अशा स्थितीत परदेशातील स्पर्धांमध्येच नाही तर देशातील स्पर्धांसाठीही खेळाडूंना सातत्याने प्रवास करावा लागतो. आगामी किमान 3 महिन्यांच्या कालावधीत देशांतर्गत स्पर्धा व परदेशातील स्पर्धा एकाच ठिकाणी आयोजित करण्याची खरी गरज आहे आणि त्यासाठी सर्व संघटनांचा पाठिंबा घेण्यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आग्रही राहणे गरजेचे आहे.
एकाच ठिकाणी ठरावीक दिवसांच्या ब्रेकनंतर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या तर खेळाडूंना करावा लागणारा प्रवास मार्यादीत राहील. तसेच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा देखील एकाच ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजेत. थॉमस आणि उबेर चषक स्पर्धा असेच वेळापत्रक तयार करुन घ्याव्या लागणार आहेत, असे मतही गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.