सुसंस्कृत तालुक्याची प्रतिमा होतेय मलीन; प्रशासनाच्या कचखाऊपणामुळे भोंदूंना पाठबळ
वाई – मांढरदेव येथे काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धेतून अपघात होऊन शेकडो भाविकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून मांढरदेव गडावर पशुहत्या व अंधश्रद्धेतून होणाऱ्या प्रकारांवर प्रशासनाने बंदी घातली; परंतु मांढरदेव व्यतिरिक्त तालुक्यात अनेक ठिकाणी अशा रूढींना खतपाणी घातले जात असून त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. अंगात येणे, पशुहत्या, झाडांना खिळे ठोकणे, करणी, अंगातील भूत काढणे अशा क्लुप्त्या करून अडाणी लोकांना घाबरवून आर्थिक मोबदला उकळला जात आहे. मांढरदेव येथे या गोष्टींना मज्जाव असल्याने भोंदूबाबा औद्योगिक वसाहतीतील काळूआईच्या मंदिरात हे प्रकार करत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत असलेल्या वाई तालुक्याची प्रतिमा मलीन होत आहे.
औद्योगिक वसाहतीतील काळूबाई मंदिरात पशुहत्या राजरोस होत आहेत. मांढरदेव येथील मंदिराच्या परिसरात प्रशासनाने अवैध गोष्टींवर बंदी घातली तरी झाडांना खिळे ठोकणे, करणी, अंगात येणे हे प्रकार संपूर्ण वर्षभर सुरू असतात. वाई तालुक्यातील मांढरदेव, धावजी-पाटील व धनगरबुवा मंदिर या ठिकाणी दर अमावास्या व पौर्णिमेला बुवाबाजी सुरू असते. अनेक अनिष्ट रुढींमुळे हा परिसर बदनाम झाला आहे. वाई तालुक्याला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याप्रमाणे वाईदेखील शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. अशा सुसंस्कृत वाई तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बुवाबाजी सुरू आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. ही बुवाबाजी मुळासकट उपटून टाकण्यासाठी पोलिसांबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसे झाले तरच गणेश शिंदेसारख्या भोंदूला जरब बसेल.
धावजी-पाटील मंदिरातील भोंदूबाबांवर एलसीबीने कारवाई करून पाच देवऋषींना अटक केली होता; परंतु त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे. आजमितीला त्या ठिकाणी अवैध धंदे व भोंदूगिरी सुरू आहे. बुवाबाजीविरोधात फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच कारवाई करावी, अशी अपेक्षा न ठेवता समाजाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील भोळीभाबडी जनता अजूनही अंधश्रद्धेला बळी पडते.
भोंदूबाबांकडून पैशाची लूट आणि महिलांवर अत्याचार होतात. यातून कोणताही बोध न घेता भोंदूबाबांच्या अत्याचाराला ग्रामीण व शहरी भागातील महिलाही बळी पडताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांनी अशा भोंदूबाबांना न घाबरता त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे यावे. प्रशासनानेही कचखाऊपणा न करता या भोंदूबाबांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.