मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील सध्याच्या स्थितीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकारात्मक भूमिका घेतील. लवकर सरकार स्थापन होणे गरजेच आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देईल असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांनी दोन पावले मागे यावे. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला होऊ शकतो. शिवसेना आमच्या सोबत असणे गरजेचे आहे. येत्या दोन दिवसात शपथविधी पार पडला पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहेत, असे रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजप मान्य करणार नाही. ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होणे योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला रिपाइंचा पाठिंबा रामदास आठवले यांनी दिला आहे. शिवसेनेला त्यांच्या जागांप्रमाणे सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे. सरकारमध्ये शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळतील. मात्र, शिवसेनेने अवास्तव मागणी करु नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.