मधुमेह हा लाईफस्टाईएल डिसीज मानला जात असला तरी हा आजार उच्चभ्रूंचा असल्याचा एक गैरसमज समाजामध्ये आहे. मात्र, त्याविषयी सखोल माहिती कोणी घेताना दिसत नाही. ऐकीव आणि अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, हा लेख वाचा आणि तुमचे मधुमेहाबाबतचे गैरसमज दूर करुन वस्तुस्थिती काय आहे ते ही माहिती करुन घ्या. चला तर मग…
गैरसमज – मधुमेह हा प्रौढांचा व स्थूल व्यक्तींचा आजार आहे.
वस्तुस्थिती – भारतीयांमधील मधुमेह पाश्चात्यांच्या तुलनेत काही बाबतीत वेगळा आहे. पाश्चात्यांच्या तुलनेत अत्यंत सडपातळ असलेल्या भारतीयांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. शिवाय भारतीयांच्या आहारात काही पोषकद्रव्यांची कमतरताही दिसून आली आहे. यामुळे भारतीय वंशाचे लोक कमी वयातच व स्थूल नसतानाही मधुमेहाला बळी पडत आहेत. शिवाय आजची बदलती जीवनशैली, लहान मुलांमधील खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मैदानी खेळांचा आभाव व टी.व्ही. चा प्रभाव यामुळे लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.
गैरसमज : माझी शुगर एगदी बॉर्डरला आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
वस्तुस्थिती – शुगर बॉर्डरला असताना देखील मधुमेहाच्या दुष्परिणामांचा धोका नाकारता येत नाही. शिवाय शुगर बॉर्डरला असतानाच योग्य काळजी घेतल्यास शुगर बॉर्डर क्रॉस करून पलिकडे जाण्याचा (वाढण्याचा) धोका टाळता येईल!
गैरसमज : मधुमेह हा अनुवंशिक आजार आहे. माझ्या आई-वडीलांना मधुमेह नाही. त्यामुळे मला मधुमेहाचा धोका नाही!
वस्तुस्थिती – मधुमेहाच्या अनेक धोक्याच्या घटकांपैकी अनुवंशिकता हा एक धोक्याचा घटक (risk factor) आहे. अनुवंशिकता नसताना इतर धोक्याचे घटक (उदा. स्थूलता, बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, ताणतणाव, उच्चरक्तदाब इ.) असतील तरीही मधुमेह होऊ शकतो.
गैरसमज : वजन जास्त असताना मधुमेह टाळण्यासठी/आटोक्यात आणण्यासाठी खूप वजन घटवावे लागते.
वस्तुस्थिती – तुमचे वजन जर जास्त असेल तर केवळ 7 ते 10% वजन घटवून (उदा. 72 किलो वजन असेल तर 7 ते 8 किलो वजन घटवून) तुम्ही मधुमेहाचा आणि त्याच्या दुष्परिणामांचा धोका बऱ्याच अंशी कमी करु शकता.
गैरसमज : गरोदरपणातील मधुमेह फारसा गंभीर नाही. प्रसूतिनंतर तो निघून जातो.
वस्तुस्थिती – गरोदरपणातील मधुमेह जरी प्रसूतिनंतर जात असला तरी भविष्यात अशा मातेला व तिच्या बालकाला मधुमेह होण्याची शक्यता मोठी असते. त्यामुळे गरोदरपणातील मधुमेहाची योग्य काळजी घेणे व प्रसूतिनंतरदेखील नियमित तपासणी व आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे महत्वाचे आहे.
गैरसमज : खूप साखर किंवा गोड खाल्ल्याने मधुमेह होतो.
वस्तुस्थिती – हे अर्धसत्य आहे. खूप गोड खाऊन वजन वाढतण्याची शक्यता असते व वजन वाढून मधुमेह होण्यची शक्यता वाढते. गोड न खाता देखील आहारात अतिरिक्त चरबी, तेल-तूपाचा वापर, व बैठी जीवनशैली यामुळे वजन वाढून देखील मधुमेहाचा धोका त्याच पटीत वाढतो.
गैरसमज : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट आहार घ्यावा लागतो.
वस्तुस्थिती – इतरांप्रमाणे मधुमेही व्यक्तींसाठीदेखील घरचा, ताजा व संतुलित आहार सर्वोत्तम असतो. पॅकबंद, बाहेरील पदार्थ टाळणे, गोड-तेलकट पदार्थांपासून लांब रहाणे, ताजी फळे, भाज्या, मोडाची कडधान्ये आहारात घेणे हे मधुमेहींसाठी त्याचप्रमाणे मधुमेह नसणाऱ्यांसाठी देखील महत्वाचे आहे. मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींनी असा आहार घेतल्यास त्या मधुमेहाला चार हात लांब ठेवू शकता!
गैरसमज : मधुमेही व्यक्ती भात खाऊ शकत नाहीत मात्र पोळी, भाकरी हव्या तितक्या प्रमाणात खाऊ शकतात.
वस्तुस्थिती – तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या सर्व धान्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण सर्वसाधारणपणे सारखेच असते. त्यामुळे यातील काहीही खाऊन शुगर सारख्याच प्रमाणात वाढते. भात जर पॉलिश केलेल्या (पांढऱ्या) तांदळाचा असेल, तर रक्तातील साखर वेगाने वाढते. रवा, मैदा (साल काढून प्रक्रिया केलेला गहू) यामुळे देखील हाच परिणाम होतो. त्यामुळे सालासकटच्या धान्यांना (हातसडीचा तांदूळ, न चाळता गहू/ ज्वारी/ बाजरीचे पीठ) प्राधान्य देणे व ती देखील मर्यादित प्रमाणात खाणे उत्तम!
गैरसमज : मधुमेहासाठी शुगर-फ्री पदार्थ खाणे चांगले.
वस्तुस्थिती – शुगर-फ्री घातलेल्या पदार्थांमध्ये साखर नसते हे खरे पण त्यात चरबी (तेल, तूप), मैदा व इतर हानिकारक पदार्थांचे प्रमाण तितकेच असते हे विसरून चालणार नाही! उदा. शुगर फ्री मिठाई, खीर, श्रीखंड, चॉकोलेट्स, बिस्किटे, केक इ. कधीतरी बदल म्हणून हरकत नाही, पण नियमित स्वरुपात शुगर-फ्री घातलेले वापरू नयेत. या शुगर-फ्री म्हणून वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे (सुक्रालोज, ऍस्पार्टेम इ.) दीर्घकालीन दुष्परिणाम अजून नीटसे माहित नाहीत. त्यामुळे गरोदरपणात मधुमेह असणाऱ्या स्त्रिया, बालमधुमेही, मधुमेहाचा मूत्रपिंडांवर परिणाम झालेल्या व्यक्ती अशांनी हे पदार्थ टाळणेच श्रेयस्कर.