– अरुण गोखले
ज्या माणसांना खरोखरच असे वाटते की, आपल्याला बहुभाग्याने मिळालेल्या या नरदेहाचे सार्थक व्हावे, हा मनुुष्यजन्म सार्थकी लागावा, तर त्यासाठी प्रथम आपण साधू, संत आणि सद्गुरूंची संगत साधायला हवी. कारण तेच आपल्याला खरा आत्मकल्याणाचा मार्ग दाखवू शकतात. त्यांनी दिलेला बोध, शिकवण, नाम साधना, उपासना ही आपण आचरणात आणावी लागते.
पण प्रश्न असा आहे की, आपल्याला असे साधू, संत किंवा सद्गुरू हे भेटणार कसे? आपण त्यांना ओळखणार कसे? त्यांची आणि आपली भेट कशी होणार आणि ती होण्यासाठी काय करायला हवे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना महाराज आपल्याला असे सांगतात की, बाबारे! तू एक कर, देवरूपी संतांची, सद्गुरूंची, मार्गदर्शकाची भेट होण्यासाठी तू खडीसाखर हो.
आता आपल्याला असे वाटेल की, हे खडीसाखर हो म्हणजे नेमके काय? तर त्याचे उत्तर असे की, तू प्रथम तुझ्या मनाला, वाचेला त्या गोड नामस्मरणाची गोडी लावून घे. त्या खडीसाखरेसारखा तू स्वच्छ हो. तुझ्यातल्या प्रत्येक गोष्टीतला मी कर्ता हा अहंकाररूपी वृत्तींचा जो कडवटपणा आहे तो काढून टाक. नामाची कास धर. तू देवाचे नामस्मरण करीत राहा.
तू जर का खडीसाखर झालास ना, तर जसे मुंग्या, मुंगळे हे न बोलावता त्या खडीसाखरेच्या जवळ येतात. तसे तुझ्या जवळ संत, सद्गुरू हे चालून येतील. ते नामउपासक म्हणून तुझ्यावर कृपा करतील. तुझ्या मनात वृत्तींचे वैराग्य निर्माण करतील. तुझी प्रपंच्यातली आसक्ती दूर करून तुला परमार्थातली भक्तीची वाट दाखवतील.
पण हे केव्हा घडेल? जर तू खडीसाखर झालास तर. आता खडीसाखर व्हायचे म्हणजे काय? तर संतांना, सद्गुरूंना आवडणारे वर्तन करणे. त्यांना अहंकाररहीत झालेले, शरणागत झालेले, लीन झालेले आवडते. ते अशा एकनिष्ठ श्रद्धावान अनन्य शरणांगतांवर कृपा करतात. त्याच्या नामामागे आपल्या शक्तीचे बळ उभे करून त्यास त्या नामाच्या बळावर भगवंताचे रूप दाखवतात.
त्याचा जीवदशेकडून शिव दशेकडे जाण्याचा उर्ध्व प्रवास हा सुलभ बनवतात. त्याचे खरे आत्मकल्याण कशात आहे हे त्याला सांगतात. देव आणि भक्त हे द्वैत घालवून जीवाशिवाचे ऐक्य घडवितात. पण त्यासाठी आधी भक्त, भाविक, साधक आणि उपासकाने खडीसाखर व्हायला लागते.