अरुण गोखले
संत, सद्गुरू आणि देव यात एक मोठं साम्य आहे. ते म्हणजे ते त्यांच्याकडे अनन्य भावाने शरण येणाऱ्या जीवाचे त्याच्या गुणदोषासह त्याचा स्वीकार करतात. सद्गुरूंच्या बोधाची रीतच काही आगळी वेगळी असते.
पू. बापू वाटेगावकर यांची एक छोटीशी; पण तेवढीच लाखमोलाची गोष्ट आठवते. एकदा काय झालं, एक प्रापंचिक गृहस्थ हे बापूंकडे मार्गदर्शनासाठी आले. ते गृहस्थ ज्या वेळी आले त्यावेळी पू. बापू हे त्यांच्या श्री वासुदेव मंदिराच्या परिसरातील बागेत काम करीत होते. एका वाफ्यातील रोप काढून ते दुसऱ्या वाफ्यात लावीत होते. त्यांच्या मागे उभे राहून ती व्यक्ती पू. बापूंची ही कृती पाहत होती. पण पू. बापूंचे आपल्यामागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे लक्ष नव्हते.
त्यांचं आपलं हाताने काम आणि मुखाने वासुदेवाचे नाम चालू होते. तेव्हा आपल्या आगमनाची जाणीव त्यांना करून देत त्या व्यक्तीने बापूंना विचारले, “”महाराज मला परमार्थ करायचा आहे, पण प्रपंच तर काही सुटत नाही मी काय करू?” त्यावर चटकन बापू म्हणाले, “”इतकंच ना, अहो मग तर सोपं आहे. इकडून काढा आणि तिकडे लावा म्हणजे झालं”.
मात्र त्या व्यक्तीस त्याचा काही नीटसा उलगडा होईना. तेव्हा आपल्या त्या बोधाची फोड करून सांगताना ते म्हणाले, “”हे पहा, तुम्हाला राग येतो, होय ना? येऊ दे. पण तो मात्र अधर्म, अनीती, अत्याचार, खोटेपणा, दांभिकता याचा यायला हवा. त्या गोष्टी दूर तुम्ही सारायला हव्यात. तुम्हाला अहंकार सुटत नाही, नको सुटू दे. तो तुम्ही धनाचा, पैशाचा न धरता मी देवाचा आहे, देव माझा पाठीराखा आहे याचा धरा म्हणजे झालं. हे पाहा, माणसाला लोभ सटत नाही.
आसक्ती, हव्यास सुटत नाही खरं ना?, पण तो लोभ, ती आसक्ती, तो हव्यास हा वाईटाचा न धरता सद्विचार, सत्संग, सदाचरण याचा धरा. हे बघा, आपणच आपल्या विचारांची, कृतीची आणि मानसिकतेची दिशा बदलली ना की आपलाच प्रपंच हा कधी परमार्थात बदलून जातो, ते आपलं आपल्याही कळत नाही. कारण बाबांनो! स्वार्थ म्हणजे प्रपंच आणि नि:स्वार्थ म्हणजे परमार्थ इतकी त्याची व्याख्या सोपी आहे. जमते करून तर पाहा ना”.