– अरुण गोखले
आरसा हा जसा माणसाला त्याचं जसं आहे तसं खरं खुरं रूप दाखवतो.त्या प्रमाणेच प्रत्येकाचे मन हे त्याला त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीची जाणीव करून देत असते. माणूस जगाला फसवू शकतो पण तो आपल्या मनाला फसवू शकत नाही.
मांजराप्रमाणे डोळे मिटून केलेले पाप हे जरी जगाला दिसत नसले तरी ते आपण आपल्या मनापासून लपवू किंवा दडवू शकत नाही. कारण मानवी मन हे त्याच्या प्रत्येक विचार आचार आणि कृतीचे साक्षीदार असते. हे मनाचे साक्षीत्व ज्याला पटले आहे ती व्यक्ती सहसा दुष्कृत्य करायला धजत नाही.
त्या व्यक्तीला माहीत असते की, अन्य कोणी जरी माझे वर्तन हे पाहात नसले, तरी माझ्या मनातले दुष्ट विचार वासना, कल्पना, अभिलाषा या इतर कोणास कळत नसल्या, तरी माझं मन हे त्याला नक्कीच साक्षी आहे. मी किती खरेपणाने वागतोय, कोणता विचार करतोय, माझ्या मनात काय खलतंय हे माझ्या मनाला मात्र नक्कीच माहीत असते.
माणसाच्या मनाला यासाठीच दर्पणाची म्हणजे आरशाची उपमा दिलेली आहे. आरसा हा आपल्याला आपलं नेमकं रूप काय हे प्रामाणिकपणे दाखवत असतो. एखादा नट हा जेव्हा रंगपटात आरशासमोर बसतो तेव्हा प्रथम त्याच्या समोरच्या आरशात त्याचा मूळ चेहरा दिसतो. त्यानंतर दाखवतो ते त्याचे वरवरचे धारण केलेले रूप.
तेही त्या नाटका पुरते, पुन्हा रंग उतरवला, वेषभूषा उतरवली की आतला माणूस हा जशाच्या तसाच आरशासमोर उभा असतो. मानवी मन हे त्या दर्पणासारखेच आहे. ते माणसाला तो कधी आणि कसा आहे हे सांगत असते, त्याला खरं तर जागे करीत असते. काय चूक आणि काय बरोबर हे समजावीत असते.
गाण्याची ओळ या संदर्भात आठवते- “तोरा मन दर्पण कहलावे।। भले बुरे सारे कर्मोको देखे और दिखावे। तोरा मन दर्पण कहलावे।।’ खरंच किती सार्थ वर्णन आहे हे. कारण माणसाचं मन हे खरं तर त्याला प्रत्येक वेळी साक्षीभावाने जागवत असते, दुराचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असते. पण मनाचं हे हितकारी सांगणं मनावर घेतलं तर ना?