अरुण गोखले
माणसाच्या हातून जे काही घडत असते त्याचा कर्ता करविता वास्तविक परमेश्वरच आहे. कारण ईश्वराच्या इच्छेशिवाय जिथे साधे झाडाचे पानही हालत नाही तिथे मनुष्य तो काय करणार! पण प्रत्यक्षात मात्र असे घडताना दिसते की माणसाला त्याच्या कर्तेपणाचा अहंकार होतो.
जे घडले आहे, मिळाले आहे, प्राप्त झाले आहे ते ईश्वरी कृपेने नाही तर मी माझ्या बुद्धी व शक्ती सामर्थ्यानेच मिळविलेले आहे. या सर्वाचा कर्ता करविता मीच आहे, असा त्यास अहंकार होतो. हाच अहंकार त्यास घातक ठरत असतो. खरं तर नको असणारा अहंकार, गर्व, ताठा यामुळे त्याला काही उपयोग होत नाही.
त्यास बुद्धीचा, ज्ञानाचा, पांडित्याचा गर्व होतो. धनसंपत्ती, सत्ता, अधिकार याचा गर्व होतो. मीच श्रीमंत, मीच बडा, मीच श्रेष्ठ असे मानून तो आपल्यातल्याच माणुसकीला आपल्यापासून भेदाभेदाच्या भिंती घालून दूर करतो. शक्ती सामर्थ्याच्या गर्वाने तो उन्मत्त होतो. या अहंकारापायी अनेक जीव आपल्या लाख मोलाचे जीवन मातीमोल करून बसले आहेत. त्यांच्या अहंकारानीच त्यांचा ऱ्हास केला आहे. हा अहंकार जीवास अविवेकी, अविचारी, अंध बनवितो.
मनाचे सर्व स्वास्थ्य खराब करणारा, आरोग्य बिघडवून टाकणारा अहंकार कोणा जीवास होऊ नये अशीच साधू, संत आणि सद्पुरुषाची ईश्वराकडे मागणी असते. या ठिकाणी संत नामदेवरायांनी पंढरीनाथाकडे अशीच मागणी करताना म्हटलेले आहे की, “अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णूदासा भाविकासी ।।’
संत एकनाथ महाराजांनी त्याच्या एका भारूडात अहंकाराने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल तर काय करा, हा उपाय सांगितला आहे. ते असा मोलाचा सल्ला देतात की, “अहंकाराच्या वाऱ्याने जर छातीचा गर्वाचा फुगा फुगला असेल तर विवेकाची टाचणी टोचून त्यातली हवा काढून टाका.
गर्वाचा घातक ताठरपणा सोडा आणि निगर्वी, निहंकारी होऊन जीवनाचा सुखानंद घ्या’.
पंढरीच्या वारकऱ्याच्या मनातला हा अहंकार दूर करण्यासाठीच त्याला तो दूर ठेव आणि “पाया लागे जन एकमेका’ ही सांप्रदायाची ब्रीदावली जागवीत एकमेकांना नमन करा. प्रेमाने एक व्हा, ही लाख मोलाची शिकवण दिलेली आहे.