औरंगाबाद – रस्ते चांगले तरच शहराचा विकास शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न करावेत. या भागातील रस्ते विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हर्सूल येथील भगतसिंग नगर येथे विविध वॉर्डामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे म्हणाले, शहरात विविध ठिकाणी विकासकामे होत आहेत. नागरिकांना सोयीसुविधा देणे शासनाची जबाबदारी आहे. औरंगाबादच्या मनपाला रस्त्यासाठी 250 कोटी, पाणी पुरवठा योजनेसाठी 1650 कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केलेला आहे. त्यामुळे शासनाचे विकासाला प्राधान्य असून औरंगाबाद शहरातील सोयीसुविधा अधिक दर्जेदार करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.