तालुक्यातील नागरिकांनी विविध विषयांवर मांडल्या तक्रारी
सासवड (प्रतिनिधी) – पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 10 वर्षांनंतर पुरंदर तालुक्यातील आमसभा आज सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतीक भवनात पार पडली. महसुल, महावितरण, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, सामाजिक वनीकरण, वनविभाग, जिल्हा परिषद, सासवड व जेजुरी नगरपालिका, तालुक्यातील ग्रामपंचायती या विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमसभेत नागरिकांनी विविध समस्या, अडचणी, प्रश्न अगदी उत्स्फुर्तपणे मांडल्या. यावेळी महावितरणचे वीजपुरवठ्याचे अयोग्य वेळापत्रक, शेतीचा रात्रीचा वीजपुरवठा तात्काळ बंद करून दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करावा, ही प्रमुख मागणी मांडली पुरंदर महसुली प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांनी यथेच्छ समाचार घेत प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे अधिकारी उशीरा आल्याने त्यांच्या कारभावरील प्रश्न चिन्ह कायम राहिले. तालुक्यातील महावितरणचे भारनियमन, पीकांची नुकसान भरपाई, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळावी, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य विभागाच्या कारभारातील घोळ याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी तब्बल 3500 पेक्षाही अधिक तक्रार, विनंती अर्ज आज दिले आहेत. या सर्व अर्जांची छाननी करून एका महिन्यात यावर अंमलबजावणी केली जाईल. तालुक्यातील वीजेचे भारनियमन हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीत लवकरच बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल.गुंजवणी, जानाईशिरसाई योजनांच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, असे नियोजन केले जाईल. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुदामराव इंगळे, विजय कोलते यांच्यासह तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.