नवी दिल्ली – सर्वच प्रकारची माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी वेगळ्याच पद्धतीने हल्ला चढवला आहे. एनडीएची व्याख्या त्यांनी नो डाटा ऍव्हेलेबल अशी केली आहे.
त्यांनी या संबंधात जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, सरकारकडे स्थलांतरित मजुरांचा डाटा उपलब्ध नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयीचा डाटा उपलब्ध नाही, आर्थिक मदतीविषयीचा त्यांचा डाटा चुकीचा आहे, कोविडविषयीचा त्यांचा डाटा संशयास्पद आहे,
जीडीपीच्या संबंधातील त्यांचे आकडे खोटे आहेत. त्यामुळे सरकारने आपल्या एनडीए आघाडीला आता वेगळेच स्वरूप दिले असून त्यांचे हे स्वरूप कोणताच डाटा उपलब्ध नसलेले सरकार असे झाले आहे, असे थरूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सरकारकडे कोणताच डाटा उपलब्ध नसल्याच्या प्रकरणावरून कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही काल सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. देशात शेतकऱ्यांचे लक्षावधी व्यवहार रोज होत असतात, त्याचा डाटाच सरकारकडे उपलब्ध होणार नसेल तर किमान आधारभूत किमतीवर कोणत्या शेतकऱ्याला भाव मिळाला आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळाला नाही ही माहिती सरकार कोठून जमा करणार, असा सवाल त्यांनीही काल उपस्थित केला होता.