Rajya Sabha Election : देशातील १२ राज्यांतील राज्यसभेच्या २६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जून रोजी निवडणूक जाहीर केली असून या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) एक जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचे राज्यसभेतील संख्याबळ वाढण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या पक्षाला पहिल्यांदाच राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यसभेतील विविध सदस्यांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलैदरम्यान संपत असल्याने या जागांसाठी निवडणुका घेण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जून असून १८ जून रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. सध्याचे संख्याबळ आणि संभाव्य चित्र – या २६ जागांपैकी सध्या एनडीएकडे १८ जागा आहेत. काँग्रेसकडे ४, झारखंड मुक्ती मोर्चाकडे (झामुमो) १ तर वायएसआर काँग्रेसकडे ३ जागा आहेत. मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार निवडणुकीनंतर एनडीएचे खाते १७ वर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक जागेची वाढ होऊन ५ जागा मिळू शकतात. झामुमोला २ जागा, तर तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ला पहिल्यांदाच राज्यसभेतील प्रवेश मिळू शकतो. हेही वाचा – लवकरच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि यूएईला मागे टाकेल: सीएम फडणवीसांचा मोठा दावा सध्या २४४ सदस्यीय राज्यसभेत एनडीएकडे १४९ सदस्य आहेत. विरोधकांकडे ७८ तर अपक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांकडे १७ सदस्य आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ नियमित द्वैवार्षिक निवडणूक म्हणून नव्हे, तर संसदेतल्या भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाने पाहिले जात आहे. कोणत्या राज्यात किती जागा? राज्यसभेच्या निवडणुका खालीलप्रमाणे होणार आहेत : आंध्र प्रदेश – ४ जागा गुजरात – ४ जागा कर्नाटक – ४ जागा मध्य प्रदेश – ३ जागा राजस्थान – ३ जागा झारखंड – २ जागा मणिपूर – १ जागा मेघालय – १ जागा अरुणाचल प्रदेश – १ जागा मिझोराम – १ जागा याशिवाय महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात एनडीएची ताकद – महाराष्ट्रातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहे. त्या विधानसभा निवडून आल्याने त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले होते. विधानसभा संख्याबळ पाहता ही जागा एनडीएकडेच राहण्याची शक्यता प्रबळ आहे. या जागेचा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांसाठी ही जागा जिंकणे जवळपास अशक्य मानले जात आहे. तामिळनाडूत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री? तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सी. वे. षण्मुगम यांनी विधानसभा निवडून आल्यामुळे राज्यसभेचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर हे समीकरण जुळले, तर टीव्हीकेचा संसदेतला हा पहिलाच प्रवेश ठरेल. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात ही निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटकात काँग्रेसचे वर्चस्व – कर्नाटकातील चार जागांपैकी काँग्रेस तीन जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते. येथे काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने राज्यसभेच्या जागांवर त्यांचे वर्चस्व दिसून येत आहे. एनडीएची जी एक जागा कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे, ती प्रत्यक्षात कर्नाटकातील समीकरणामुळेच आहे. सध्या कर्नाटकातील ४ पैकी भाजप-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या दोन जागा आहेत. मात्र विधानसभा संख्याबळानुसार आता काँग्रेस ३ जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि भाजपला फक्त १ जागा मिळू शकते. त्यामुळे एनडीएचे एकूण संख्याबळ एका जागेने घटणार आहे. याच राज्यातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा कार्यकाळ संपत आहे. गुजरातमध्ये भाजप क्लीन स्वीपच्या तयारीत – गुजरातमधील चारही जागांवर भाजप विजय मिळवेल, असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभा संख्याबळामुळे काँग्रेसला येथे फारशी संधी नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांचाही कार्यकाळ याचवेळी संपत आहे. राजस्थानात भाजप २, काँग्रेस १ राजस्थानमधील तीन जागांसाठीची निवडणूक तुल्यबळ ठरणार असली तरी भाजपला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. २०० सदस्यीय विधानसभेत भाजपकडे ११८, काँग्रेसकडे ६७ आमदार आहेत. राज्यातील निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री रवनीत सिंग, काँग्रेसचे नीरज डांगी आणि भाजपचे राजेंद्र गहलोत यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात भाजप आघाडीवर – मध्य प्रदेशातील तीन जागांपैकी भाजप दोन आणि काँग्रेस एक जागा जिंकू शकते. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना मोठा अडथळा अपेक्षित नाही. येथून केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा कार्यकाळ संपत आहे. झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंगची शक्यता – झारखंडमध्ये झामुमो-काँग्रेस आघाडी दोन्ही जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. मात्र भाजपकडे स्वतःचे २१ आमदार असून काही अपक्ष किंवा विरोधी आमदारांचे मतदान फुटल्यास भाजप एक जागा हिसकावण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे येथे क्रॉस व्होटिंगकडे विशेष लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी मजबूत – आंध्र प्रदेशातील चारही जागा तेलुगू देसम पक्षाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर टीडीपी-भाजप आघाडीने राज्यात मजबूत पकड निर्माण केली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये बिनविरोध शक्यता – मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार असली तरी बहुतेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. कोणत्या दिग्गजांचा कार्यकाळ संपत आहे? या निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात : एच.डी. देवेगौडा मल्लिकार्जुन खर्गे दिग्विजय सिंह रवनीत सिंग जॉर्ज कुरियन शक्तीसिंह गोहिल यांचा समावेश आहे. राज्यसभा निवडणुकांमधील हे बदल आगामी संसदीय अधिवेशनांतील राजकीय रणनीती, विधेयकांवरील गणित आणि विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.