भाजप सरचिटणीस विजयवर्गीय यांचे प्रतिपादन
कोलकाता – राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे नवीन मित्रपक्षांना एनडीएत आघाडीत प्रवेश देण्यासाठी आमची दारे त्यांना कायमच खुली आहेत असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. तथापी आम्ही बंगाल मधील 42 पैकी 30 जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ममता बॅनर्जी यांना एनडीएत पुन्हा स्थान मिळू शकेल काय असे विचारता ते म्हणाले की हा काल्पनीक प्रश्न आहे. त्याला उत्तर देता येणार नाही. राजकारणात कोणीही कायम शत्रु नसतो. जर त्यांना या आघाडीत यावे असे वाटत असेल तर त्यांना घ्यायचे की नाही यावर आम्हीं विचार करू. ही निवडणूक देशभक्त आणि कुर्सी भक्तांमधील आहे.
अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी आपल्या सुरक्षा दलांच्या यशावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे हे दुर्देवी आहे. याच मुद्द्यावर आम्ही तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात लढत आहोत असे ते म्हणाले. देशात भाजपला सन 2014 पेक्षा अधिक जागा मिळतील असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.