मुंबई : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या वक्तव्याने मागच्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत येत आहेत. दरम्यान, त्यांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असे मिटकरींनी म्हटले आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचे स्वागतच असल्याचे सूचक विधानही मिटकरींनी केले आहे.
विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचेही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत. भाजपाने २०२४ च्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘४५ प्लस’ या ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याच्या मोहिमेत बारामतीमध्ये नंबर एकला आमची जागा असेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. याचसंदर्भातून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिटकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “उम्मीद पे दुनिया कायम हैं. बावनकुळेंना वाटतं ना? पण जनतेच्या मनात काय आहे? जनता त्यांना जागा दाखवून देणार,” असे उत्तर दिले. तसेच पुढे, “बावनकुळेंना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे. जसं पंकजाताई काल बोलून गेल्या, मी ठरवलं तर मोदीजीही माझा पराभव करु शकणार नाही. शेवटी जनतेनं परळीमध्ये उत्तर दिलं,” असेही मिटकरी म्हणाले.
मिटकरींनी पंकजा मुंडेंचा उल्लेख केल्याने त्यांनी परळीमधील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात केलेल्या ‘मीच बेरोजगार आहे’ या विधानावरुन पत्रकाराने प्रश्न विचारला. “मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी त्या मुद्द्यावर ठाम आहे. पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरु आहे. तो प्रयत्न फडणवीस सरकारकडून सातत्याने होतो आहे. आतापर्यंतही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली गेलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या कन्या आहेत. तोलामोलाच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्रातील वजनदार नेत्या आहेत. पण आतापर्यंतही त्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच त्या अस्वस्थ आहेत. माझा विश्वास आहे की पंकजाताई लवकरच मोठा निर्णय घेतील,” असे उत्तर दिले.
यावरुन, “मोठा निर्णय म्हणजे काय? नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुम्ही राष्ट्रवादीत त्यांना निमंत्रित केलं होतं” असा संदर्भ देत प्रश्न विचारला. “मी मागंही म्हटलं होतं. सुप्रियाताईंनीही त्याचं समर्थन केलं होतं की जर पंकजाताईंसारख्या बड्या नेत्या पक्षामध्ये येत असतील तर स्वागत आहे. भाजपामध्ये त्या अस्वस्थ आहेत. कालच्या एका शोमध्ये त्यांची वक्तव्यं दाखवली. भगवान गडावरचं वक्तव्य, दसरा मेळाव्यातील वक्तव्य, कार्यकर्ता मेळाव्यातील वक्तव्य असेल. ते सर्व पाहता त्या अस्वस्थ आहेत. भाजपाला त्या सोडचिठ्ठी देतील एवढं मात्र नक्की,” असे मिटकरींनी म्हटले आहे.