मुंबई – शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, मातोश्रीसोबत दगाफटका केला, ठाकरे यांचा विश्वासघात केला, आणि स्वतःची कृती योग्य आहे हे दाखवण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न बंडखोर करत आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी आज(मंगळवार,दि.19) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, याआधी बुधवारी(दि.13) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप नवी दिल्लीत बोलताना केला होता. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
पुढे तपासे म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांची मोट ही शरद पवार यांनी बांधली, याची माहिती संपूर्ण देशाला आहे. यात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना त्यांनी उत्तम कारभार केला, देशातील पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचे नाव घेतले गेले. आता अनेकजण शिवसेनेला सोडून जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खंबीरपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेसोबत आहे, असे महेश तपासे यांनी सांगितले.
तसेच राज्यातील राजकीय घडामोडींबाबत आता घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात होणार असून या लढाईत घटनेचा विजय होईल, असा आमचा विश्वास आहे. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू असून यासाठी आता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ बुधवारपासून सुनावणी घेणार आहे. घटनापीठासमोर जे काही दावे प्रतिदावे या राजकीय घडामोडीवर होतील त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे सर्वात शेवटी भारतीय राज्यघटनेचाच विजय होईल, असा आमचा विश्वास आहे, असे देखील महेश तपासे म्हणाले.