पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तींयांचा असलेला साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. यामध्ये दौड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर, पुष्पगनतेश्वर, नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचा प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखे काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही. असे पाटील म्हणाले आहेत.
सरकार जाण्याचा प्रश्न संपलेला आहे. सरकार जात नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच रेड टाकणे आणि एजन्सीचा गैरवापर करणे हा उद्योग सुरू झाला आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी विचारल्यावर सर्व कारखाने त्यांना माहिती देऊ शकले असते. पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची. एकाच वेळी धाड टाकायची, पहाटे धाड टाकायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असेही पाटील म्हणाले आहेत.
तसेच देशाच्या संस्था भाजप चालवत असल्याचा आरोपसुद्धा पाटील यांनी केला आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आमचे सर्व नेते सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.