नाशिक- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाला एक वळण आल्याचे दिसून येते. त्यातच आता राज्यातील सत्तानाट्यात आमदार हरविल्याची घटना घडली आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र, पक्षातील काही आमदार संपर्कात नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे कळवणचे आमदार नितीन अर्जुन पवार हरविल्याची तक्रार त्यांचा मुलगा ऋषिकेश पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नितीन पवार हरविल्याची माहिती दिली असून, या बरोबर तक्रार अर्ज देखील पोस्ट केला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पवार हे २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे सहा वाजता पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला जातो असं सांगून घरातून निघून गेले. ते अद्याप घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नसून त्यांनीही संपर्क साधला नसल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
कळवणचे आमदार नितिन अर्जुन पवार यांच्या पत्नी व मुलाने पंचवटी पोलिस ठाणे येथे ते हरवल्याची व अद्याप घरी परत न आल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा तलाश फॉर्म सोबत जोडलेला आहे. pic.twitter.com/UARGRfnE9a
— NCP (@NCPspeaks) November 24, 2019