चौंडीत अहल्यादेवी होळकर यांना केले अभिवादन
जामखेड – भाजपला हटविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस घाबरले असल्याने कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे. मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला असून, आता ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित अघाडीची सत्ता येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीनिमित्ताने वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी घोंगडी देऊन सत्कार केला. यावेळी गोपीचंद पडळकर, नवनाथ पडळकर, रामराव पाटील, विजय मोरे, अशोक सोनवणे, दिलीप साळवे, सागर भिंगारदिवे, सुनील शिंदे, अक्षय शिंदे, अरूण जाधव, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला हटविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा कॉंग्रेसमध्ये विलीन होत आहे, याबाबत ते म्हणाले ते घाबरले आहेत. मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे.
त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. त्यांच्यासाठी काही केले नाही, त्यामुळे ते आता वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला प्रस्ताव दिला आहे का असा प्रश्न केला असता, त्यांनी सांगितले त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला नाही. तसेच अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. भाजप, सेना व कॉंग्रेस, राष्ट्रवादीला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे आम्ही ठाम आहोत.